२७ नोव्हेंबर, २०२०

प्रदूषण नियंत्रण आवश्यक


मुंबईमध्ये गेल्या काही वर्षांपासून किनाऱ्यावरील वस्त्यांमध्ये बांद्रा, कुलाबा आदी ठिकाणी भरतीच्या वेळेस पावसाळ्यात मोठा फटका बसतो आहे. यंदा मुंबईत साचलेल्या पावसाचा कहर मुंबईकरांनी दोनदा अनुभवला. मुंबईच्या शहर रचनेमुळे तसेच सखल भागात वस्ती असल्यामुळे बुडण्याचा धोका अधिक आहे. लोकवस्ती जास्त असल्यामुळेही धोका वाढू शकतो. तसेच पाणीप्रदूषण, समुद्रात कचरा, प्लॅस्टिक टाकण्याचे प्रमाणही वाढले आहे. समुद्राच्या पाण्याची पातळीदेखील वाढत आहे.

 त्यामुळे आपण कार्बन उत्सर्जन, हरित वायू आणि प्रदूषणावर नियंत्रण आणले नाही तर हा वेग भविष्यात वाढण्याचाही धोका आहे. वातावरणाचे भयानक परिणाम देखील आपण अनुभवतो आहोत. पावसाळ्यात अचानक जोरदार पाऊस येणे, नंतर बरेच दिवस पाऊस न येणे, पुन्हा जोरदार पाऊस असा अनुभव दरवर्षी येतो. एवढेच नव्हे तर आज घडीला भुजलसाठ्याचा उपसा वाढल्याने नद्यांमध्ये पाणी टिकून रहात नाही. यासाठी भुजलसाठ्याचा वापरही वाढणे गरजेचे आहे. जंगल क्षेत्रे वाढली पाहिजेत. विकासाला पूरक असे बदल घडवायला पाहीजेत.-दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा