२४ मार्च, २०२१

कामगार कायद्यांचा पुनर्विचार व्हावा

  

केंद्र सरकारने कामगार कायद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करून एक प्रकारे कामगारांवर अन्याय केला आहे. त्यामुळे बदललेल्या कायद्यांचा सरकारने पुनर्विचार करून हे कायदे मोडीत काढण्याची गरज आहे. वास्तविकता देशाच्या जडणघडणीत कामगारांचे खूप मोठे योगदान असते. मात्र, सरकारने त्यांच्या जीवावर उठणारे कायदे करून आपले भांडवलधार्जिणे जुने धोरण अवलंबिले आहे. कामगारांना दिलासा देण्यासाठी शासनाने हे कायदे त्वरित रद्द केले पाहिजेत.-दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई

कलावंतांसाठी वसतिगृह उभारा

 

धूमधडाका चित्रपटात आपल्या सहज सुंदर अदाकारीने तात्कालीन मराठी प्रेक्षकांचे लक्ष वेधलेल्या तर भटक भवानी चित्रपटात नायिकेचे काम करून आपल्या अभिनयाने लोकप्रिय ठरलेल्या किंबहुना ज्यांच्यावर चित्रित झालेले प्रियतमा हे गीत आजही ताजेतवाने वाटते. या गीताच्या नायिका ऐश्वर्या राणे मात्र वयाच्या ६७ व्या वर्षी जगण्यासाठी जीवनाच्या उत्तरायणात रस्त्यावर हात पसरून मदतीची याचना करत आहे. ही बातमी शोचनीय आहे. कलावंत मग तो लहान असो वा मोठा की देशाची, राज्याची श्रीमंती असते, वैभव असते, शान असते. समाज त्यांचा देणेकरी असतो असे म्हटल्यास वावगे ठरू नये. म्हणूनच अशा कलावंतांना दुर्दैवाने आलेले दिवस भोगावे लागू नयेत, आपले उरलेले ज्येष्ठत्वाचे जीवन समाधानाने जगता यावे यासाठी राज्य सरकारने अशा कलावंतांचा शोध घेऊन त्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. केवळ पेन्शन दिले की कर्तव्य संपत नाही. किंबहुना वार्धक्यात एकाकी जगणाऱ्यांचे जीवन अतिशय कष्टदायक आणि भीषण स्वरूपाचे होते. शासनाने अशा कलावंतांसाठी कलावंत वसतिगृह उभरावीत. जेणेकरून, जीवनसंध्या शाप ठरलेल्या जिवांना ते वरदान ठरावे. -दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई

२२ मार्च, २०२१

काय शिकवलं कोरोनानं...?

कमी पैशांत घर चालवता येतं याची जाणीव 

कोविड-19 ची साथ आली आणि त्यामुळे सक्तीने लॉक डाऊन झाला. अत्यंत तातडीच्या सेवांव्यतिरिक्त सगळे बंद..  घराचं दार बंद... कोणाकडे जायचे नाही, यायचं नाही. कुणाशी हात मिळवायचा नाही. आणि थोडक्यात काय तर स्वतःला घरात बंदिस्त करून घ्यायचं. हे सगळं कसं जमायचं. असं वाटत होतं. संपूर्ण जग स्तब्ध झाल्यासारखं वाटत होते. युद्ध नाही, लढाई नाही तर एका आजाराने मात्र लांबच लांब तोही कडकडीत बंद पाळायला भाग पाडले होते. पण आश्चर्याची गोष्ट अशी की, सुरुवातीला अशक्य वाटणारा लॉक डाऊन वाढता वाढता अनलॉकही झाला. या काळात प्रत्येकाला बरे-वाईट अनुभव आले.


कोरोनाने लोकांना बरेच दिवस घरात बंदिस्त करून ठेवले. पण, आपल्या लोकांनी यातून 'ठेविले अनंते तैसेचि राहावे' असा सकारात्मक आशय काढून एकत्र कुटुंबातील सर्वच सदस्यांसोबत राहून तणावमुक्त आनंदी जीवनाचा अनुभव घेतला. खरं तर एकत्र कुटुंबात राहणे ही आपली जुनी परंपरा आहे. पण हल्लीच्या पिढीला एकत्र कुटुंबात राहणे हे फारसं पटत नसल्यामुळे हळूहळू कुटुंब विभक्त होत गेली. कोणीही याचा गंभीरपणे विचार केला नाही. आज लॉक डाऊनच्या दरम्यान लोकांना कुटुंबातील सदस्यांनी कोणत्याही परिस्थितीत एकत्र असावं, याची जाणीव झाली. आपल्याला खरं वाटणार नाही पण आजही काही कुटुंबांमध्ये पंधरा-सोळा माणसे एकत्र राहत आहेत. या काळात आम्हाला एकत्र असण्याचा खूप फायदा झाला. त्यामुळे बंदीच्या काळातही कशाचीच कमतरता भासली नाही. याउलट आपले स्वतःचे घर सोडून रोजगारासाठी दूर शहरात राहणाऱ्या लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. मदतीला येईल असं कोणीही जवळचा माणूस नाही, त्यामुळे एकटेपणा जास्त जाणवला.


या काळात कुटुंबासोबत राहताना प्रत्येक सदस्याला जवळून समजून घेण्याची संधी मिळाली. विनाकारण केला जाणाऱ्या खर्चाला खीळ बसली आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कमी पैशातही घर चालवता येऊ शकतं हा धडा या लॉक डाऊनने आम्हाला दिला. ऑफिससाठीच्या धावपळीमुळे बऱ्याच जणांना आपल्या आवडीनिवडी जोपासता येत नव्हत्या. वाचनाची आवड आहे. परंतु वाचायला सवड नव्हती अशी सबब असते. पण या लॉक डाऊन मध्ये मात्र आम्ही बरीच पुस्तकं वाचली. काही संग्रहित केली. नियमितपणे केलेल्या वाचनामुळे ज्ञानात भर पडली. शिवाय पुस्तकांसोबत वेळ कसा गेला ते कळलंच नाही. मग उरलेल्या वेळात घरात मुलांसोबत बसून कॅरम, जुन्या वर्तमानपत्रांची फुले बनवणे असे खेळ खेळता आले. कोरोनाने गरीब-श्रीमंत, काळा-गोरा अशा प्रत्येकाला स्वच्छता आणि निरोगी जीवन कसे जगायचे हे शिकविले.-दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई



२२ फेब्रुवारी, २०२१

भिकाऱ्यांचे उच्चाटन ही काळाची गरज

 

मुंबई, दिल्ली, कोलकाता आदी शहरांत तसेच मोठमोठी मंदिरे असणाऱ्या ठिकाणी भिकाऱ्यांची वाढती संख्या हा सध्या चिंतेचा विषय बनत चालला आहे. अशा भिकाऱ्यांना पकडण्यासाठी पोलीस सामाजिक सामाजिक संस्थांची मदत घेत असतात आणि त्यांना पकडून सुधारगृहात पाठवितात. कधीकधी लहान मुलांना अपहरण करून किंवा चोरी करून आणून भीक मागण्यास बसविले जाते किंवा सिग्नलवर उभे केले जाते. लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळ्या नेस्तनाबूत करणे गरजेचे आहे. आज घडीला मुंबईत सिग्नल, मंदिर, मस्जिद, चर्चच्या समोर भिकाऱ्यांनी ठाण मांडलेले दिसून येते. सिग्नलवर तर कारचालकाकडे, गाडीत बसलेल्यांकडे हात पुढे करताना कित्येकजण दिसून येतात. तर गाडी अडविल्याचेही कित्येककदा दिसून येते. मुंबईतील भिकाऱ्यांची संख्या वाढून न देणे, त्यांचे समूळ उच्चाटन करणे ही काळाची गरज आहे. सिग्नल, मंदिरे, मशिदी, चर्च, रेल्वे स्थानाके, टोल नाके ही भिकाऱ्यांची हात पसरायची मुख्य ठिकाणे आहेत. अशा ठिकाणांवर स्थानिक संस्था, एनजिओंची मदत घेऊन पोलिसांनी भिकाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे.-दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई 

२० फेब्रुवारी, २०२१

बेपर्वा प्रवाशांवर कारवाई व्हावी


सध्या बऱ्याच रेल्वे स्थानकांत लोकल प्रवासी मुखपट्टीचा वापर करताना दिसत नाहीत. तर तिकीट खिडक्यांवरही गर्दी करत सोशल डिस्टनसिंग पाळत नाहीत. एवढेच नव्हे तर कित्येक लोकल रेल्वे स्थानकांत फलाटावर उभे असलेले प्रवासी कोपऱ्यातील जागा बघून थुंकतात. तर रुळावरही पानाच्या पिचकाऱ्या दिसून येतात. स्वतः सोबत सार्वजनिक स्वच्छताही महत्त्वाची आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनीही जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. नियमांना हरताळ फासणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे प्रशासन व जीआरपी यांनी कारवाई करावी.-दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई

२७ नोव्हेंबर, २०२०

प्रदूषण नियंत्रण आवश्यक


मुंबईमध्ये गेल्या काही वर्षांपासून किनाऱ्यावरील वस्त्यांमध्ये बांद्रा, कुलाबा आदी ठिकाणी भरतीच्या वेळेस पावसाळ्यात मोठा फटका बसतो आहे. यंदा मुंबईत साचलेल्या पावसाचा कहर मुंबईकरांनी दोनदा अनुभवला. मुंबईच्या शहर रचनेमुळे तसेच सखल भागात वस्ती असल्यामुळे बुडण्याचा धोका अधिक आहे. लोकवस्ती जास्त असल्यामुळेही धोका वाढू शकतो. तसेच पाणीप्रदूषण, समुद्रात कचरा, प्लॅस्टिक टाकण्याचे प्रमाणही वाढले आहे. समुद्राच्या पाण्याची पातळीदेखील वाढत आहे.

 त्यामुळे आपण कार्बन उत्सर्जन, हरित वायू आणि प्रदूषणावर नियंत्रण आणले नाही तर हा वेग भविष्यात वाढण्याचाही धोका आहे. वातावरणाचे भयानक परिणाम देखील आपण अनुभवतो आहोत. पावसाळ्यात अचानक जोरदार पाऊस येणे, नंतर बरेच दिवस पाऊस न येणे, पुन्हा जोरदार पाऊस असा अनुभव दरवर्षी येतो. एवढेच नव्हे तर आज घडीला भुजलसाठ्याचा उपसा वाढल्याने नद्यांमध्ये पाणी टिकून रहात नाही. यासाठी भुजलसाठ्याचा वापरही वाढणे गरजेचे आहे. जंगल क्षेत्रे वाढली पाहिजेत. विकासाला पूरक असे बदल घडवायला पाहीजेत.-दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई

फटाक्यांपासून दूर राहा

 फटाक्यांपासून दूरच राहा

काही महिन्यांपासून कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये असलेला आपला देश सध्या अनलॉक होत असताना रोजचे व्यवहार हळूहळू पूर्ववत होत आहेत. कारखाने, रस्त्यावरील रहदारी आणि त्यामुळे वायुप्रदूषनातही पुन्हा वाढ होताना दिसत आहे. त्यातच जर फटाक्यांचा धूर या हवेत पसरला तर प्रदूषणामध्ये मोठी वाढ होऊ शकते. एकतर फटाके उडवू नयेत किंवा धूर होणारे फटाके आपण स्वतः हून टाळले पाहीजेत. या धुरामुळे कोरोनाच नाही तर फुफ्फुस व श्वसनाशी संबंधित इतरही आजार होऊ शकतात. फटाक्यांच्या धुरामुळे वायुप्रदूषण वाढते आणि त्यामुळे कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आधीच लॉक डाऊनमुळे नागरिकांचे उत्पन्न कमी झाल्याने अतषबाजी करून प्रदूषणात भर घालण्यापेक्षा त्या पैशांमधून गरजू व्यक्तींना मदत करता येऊ शकते. त्यांना फराळ, कपडे देता येतील.-दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई