२२ फेब्रुवारी, २०२१

भिकाऱ्यांचे उच्चाटन ही काळाची गरज

 

मुंबई, दिल्ली, कोलकाता आदी शहरांत तसेच मोठमोठी मंदिरे असणाऱ्या ठिकाणी भिकाऱ्यांची वाढती संख्या हा सध्या चिंतेचा विषय बनत चालला आहे. अशा भिकाऱ्यांना पकडण्यासाठी पोलीस सामाजिक सामाजिक संस्थांची मदत घेत असतात आणि त्यांना पकडून सुधारगृहात पाठवितात. कधीकधी लहान मुलांना अपहरण करून किंवा चोरी करून आणून भीक मागण्यास बसविले जाते किंवा सिग्नलवर उभे केले जाते. लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळ्या नेस्तनाबूत करणे गरजेचे आहे. आज घडीला मुंबईत सिग्नल, मंदिर, मस्जिद, चर्चच्या समोर भिकाऱ्यांनी ठाण मांडलेले दिसून येते. सिग्नलवर तर कारचालकाकडे, गाडीत बसलेल्यांकडे हात पुढे करताना कित्येकजण दिसून येतात. तर गाडी अडविल्याचेही कित्येककदा दिसून येते. मुंबईतील भिकाऱ्यांची संख्या वाढून न देणे, त्यांचे समूळ उच्चाटन करणे ही काळाची गरज आहे. सिग्नल, मंदिरे, मशिदी, चर्च, रेल्वे स्थानाके, टोल नाके ही भिकाऱ्यांची हात पसरायची मुख्य ठिकाणे आहेत. अशा ठिकाणांवर स्थानिक संस्था, एनजिओंची मदत घेऊन पोलिसांनी भिकाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे.-दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई 

२० फेब्रुवारी, २०२१

बेपर्वा प्रवाशांवर कारवाई व्हावी


सध्या बऱ्याच रेल्वे स्थानकांत लोकल प्रवासी मुखपट्टीचा वापर करताना दिसत नाहीत. तर तिकीट खिडक्यांवरही गर्दी करत सोशल डिस्टनसिंग पाळत नाहीत. एवढेच नव्हे तर कित्येक लोकल रेल्वे स्थानकांत फलाटावर उभे असलेले प्रवासी कोपऱ्यातील जागा बघून थुंकतात. तर रुळावरही पानाच्या पिचकाऱ्या दिसून येतात. स्वतः सोबत सार्वजनिक स्वच्छताही महत्त्वाची आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनीही जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. नियमांना हरताळ फासणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे प्रशासन व जीआरपी यांनी कारवाई करावी.-दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई