२७ नोव्हेंबर, २०२०

प्रदूषण नियंत्रण आवश्यक


मुंबईमध्ये गेल्या काही वर्षांपासून किनाऱ्यावरील वस्त्यांमध्ये बांद्रा, कुलाबा आदी ठिकाणी भरतीच्या वेळेस पावसाळ्यात मोठा फटका बसतो आहे. यंदा मुंबईत साचलेल्या पावसाचा कहर मुंबईकरांनी दोनदा अनुभवला. मुंबईच्या शहर रचनेमुळे तसेच सखल भागात वस्ती असल्यामुळे बुडण्याचा धोका अधिक आहे. लोकवस्ती जास्त असल्यामुळेही धोका वाढू शकतो. तसेच पाणीप्रदूषण, समुद्रात कचरा, प्लॅस्टिक टाकण्याचे प्रमाणही वाढले आहे. समुद्राच्या पाण्याची पातळीदेखील वाढत आहे.

 त्यामुळे आपण कार्बन उत्सर्जन, हरित वायू आणि प्रदूषणावर नियंत्रण आणले नाही तर हा वेग भविष्यात वाढण्याचाही धोका आहे. वातावरणाचे भयानक परिणाम देखील आपण अनुभवतो आहोत. पावसाळ्यात अचानक जोरदार पाऊस येणे, नंतर बरेच दिवस पाऊस न येणे, पुन्हा जोरदार पाऊस असा अनुभव दरवर्षी येतो. एवढेच नव्हे तर आज घडीला भुजलसाठ्याचा उपसा वाढल्याने नद्यांमध्ये पाणी टिकून रहात नाही. यासाठी भुजलसाठ्याचा वापरही वाढणे गरजेचे आहे. जंगल क्षेत्रे वाढली पाहिजेत. विकासाला पूरक असे बदल घडवायला पाहीजेत.-दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई

फटाक्यांपासून दूर राहा

 फटाक्यांपासून दूरच राहा

काही महिन्यांपासून कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये असलेला आपला देश सध्या अनलॉक होत असताना रोजचे व्यवहार हळूहळू पूर्ववत होत आहेत. कारखाने, रस्त्यावरील रहदारी आणि त्यामुळे वायुप्रदूषनातही पुन्हा वाढ होताना दिसत आहे. त्यातच जर फटाक्यांचा धूर या हवेत पसरला तर प्रदूषणामध्ये मोठी वाढ होऊ शकते. एकतर फटाके उडवू नयेत किंवा धूर होणारे फटाके आपण स्वतः हून टाळले पाहीजेत. या धुरामुळे कोरोनाच नाही तर फुफ्फुस व श्वसनाशी संबंधित इतरही आजार होऊ शकतात. फटाक्यांच्या धुरामुळे वायुप्रदूषण वाढते आणि त्यामुळे कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आधीच लॉक डाऊनमुळे नागरिकांचे उत्पन्न कमी झाल्याने अतषबाजी करून प्रदूषणात भर घालण्यापेक्षा त्या पैशांमधून गरजू व्यक्तींना मदत करता येऊ शकते. त्यांना फराळ, कपडे देता येतील.-दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई

२१ सप्टेंबर, २०२०

दुधाला भाव द्या


 दुधाला किमान ३२ ते ३५ रुपये इतका भाव मिळावा

सध्या जगभर कोरोनाचा कहर सुरू आहे.  आपल्या देशातही कोरोनाने अक्षरशः थैमान मांडले आहे. कोरोनाचा जबरदस्त फटका कमी-अधिक फरकाने सर्वच क्षेत्रांना बसला व बसत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा व शेतीला पूरक व्यवसाय म्हणून ओळखला जाणाऱ्या दुग्धव्यवसायाची तर कोरोनामुळे वाटच लागली आहे. दुधाचे दर प्रतिलिटर १० ते १२ रुपयांनी कोसळले असून दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. योग्य भाव मिळत नसल्याने दुग्ध व्यवसाय पुरता मोडकळीस होण्याच्या मार्गावर आहे. दुधाला किमान ३२ ते ३५ रुपये इतका भाव मिळावा या प्रश्नासाठी आंदोलने पेटत आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने तातडीने सकारात्मक पावले उचलण्याची आवश्यकता आहे.

शेतीमालाला हमीभाव मिळत नसल्याने बहुतांश शेतकरीवर्गाच्या घरासमोर संकरीत गायीचा गोठा आहे. पतसंस्था सोसायट्या बँकांच्या माध्यमातून तरुण शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतले आहे ते कर्ज आता कशा पद्धतीने फेडायचे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा या विवंचनेत दूध उत्पादक शेतकरी पुरता अडकलेला आहे.राज्य सरकारने लवकरात लवकर यावर तोडगा काढावा.-दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई


१७ सप्टेंबर, २०२०

आर्थिक परिस्थितीशी लढण्यासाठी कौन्सिलची गरज


 आर्थिक परिस्थितीशी लढण्यासाठी कौन्सिलची गरज

कोरोना विषाणूचा संसर्ग सोडवण्यासाठी मार्च महिन्यापासून देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊनमुळे उत्पादनव्यवस्था, उद्योग, व्यवसाय सर्वकाही ठप्प झाले. कित्येक जणांचे रोजगार बुडाले आहेत. परिणामी, जीडीपी जवळपास २४ टक्क्यांनी घसरल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे जीएसटीचे कर संकलन कमी झाल्याने राज्यांना नुकसान भरपाई देण्याची क्षमता केंद्राकडे राहिलेली नाही. अनलॉकनंतर हळूहळू उद्योग व्यवसाय पूर्ववत होत असले तरी खालच्या स्तरातून मागणी नसल्याने परिस्थिती सुधारताना दिसत नाही. यावर्षीचा अर्थसंकल्प सादर केला गेला तेव्हा आर्थिक मंदीचे सावट होतेच त्यात कोरोनाचे महासंकट आले. आज जवळपास सर्वच अर्थतज्ञांच्या म्हणण्यानुसार सरकारने अर्थव्यवस्थेसाठी काही भरीव तरतूद न केल्यास मंदीमधून बाहेर पडण्यासाठी आणखी एक-दोन वर्षं लागू शकतील. जे देशाला परवडणारे नाही.


खरेतर १९२९ च्या महामंदीनंतर केनेने इंग्लंडमध्ये सांगितले तेच आज भारताला लागू करणे गरजेचे आहे. त्यानुसार खासगी लोक गुंतवणूक करीत नसतील तर सरकारने गुंतवणूक करावी. रोजगार निर्माण करावा. सरकारी खर्च वाढवावा. काही जमले नाही तर लोकांना खड्डे करण्यासाठी कामाला लावा आणि ते बुजवण्यासाठीचेही काम द्या. खड्डे खोदा आणि आपण लोकांच्या हाती पैसा द्या, असे केन या प्रसिद्ध अर्थतज्ञाने म्हटले होते. आज केंद्र सरकारने तेच करायला हवे. सरकारने आपली महसुली तूट वाढली तरी चालेल परंतु आपली मदत वाढवायला पाहिजे. जीएसटी कौन्सिलमध्ये ज्याप्रमाणे केंद्र आणि राज्य सरकार  एकत्र येऊन विचारविनिमय करतात. रोजगार निर्मितीसाठी आणि आर्थिक परिस्थिती साठी अशाच कौन्सिल निर्माण करण्याची गरज आहे, त्यातून जो निर्णय होईल त्याप्रमाणे अंमलबजावणी व्हावी. -दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई




१० सप्टेंबर, २०२०

शेतीत नवंतंत्रज्ञानाची आवश्यकता

 शेतीत नवंतंत्रज्ञानाची आवश्यकता

स्मार्ट शेती, कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान, इंटरनेट ऑफ थिंग्जचा वापर सध्या अनेक देशांमध्ये सुरू आहे. ज्यामुळे पीक व्यवस्थापन, पाऊस, पिकांवरील कीड रोगाचा प्रादुर्भाव, जमीन, माती, पीक व्यवस्थापन यांची एकत्रित माहिती सेन्सर व ड्रोनचा वापर करून मिळत आहे. शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर सध्या होत आहे. परंतु, जगाच्या तुलनेत तंत्रज्ञानाचा अत्यंत कमी वापर आपल्याकडे आहे. बाहेरील तंत्रज्ञान आपल्या देशात आणून त्याचा वापर केल्यास अनेक प्रश्न चुटकीसरशी सुटतील. शेतीसाठी नियामक कृषी लागवड नवे धोरण जाहीर करून जमिनीचा पोत तपासून कुठले पीक किती एकरात घ्यायचे याचा निर्णय पेरणी अगोदर सरकारने जाहीर केल्यास फायदा होईल. त्यामुळे शेती वटहुकुमाचा लाभ शेतकऱ्याला होण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर जागतिक अद्ययावत तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यास भारत कृषिप्रधान देश म्हणून शेतकऱ्याला आर्थिक सुबत्ता निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यास मोलाची साथ मिळेल. -दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई




९ सप्टेंबर, २०२०

बोगस बियाणे शेतकऱ्यांना मदत करा

 बोगस बियाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या

खरीप पीक पेरणी मध्ये बियाणे उगवण झाली नसल्याच्या अनेक तक्रारी महाराष्ट्रतल्या सर्वच जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात दिसून आल्या. यामध्ये प्रामुख्याने बियाणे महामंडळ व इतर अनेक कंपन्यांचे बियाणे उगवले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्या बदल्यात त्यांना बी, खते, मशागत, मजुरी सहित नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. या कंपन्यांवर अजामीनपात्र गुन्हा नोंदवावा. बोगस बियाणे विरोधात त्वरित कायदा करून त्याची कडक अंमलबजावणी करून शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे. असा कायदा सध्या राज्य सरकारने फक्त कापूस बियांसाठी केला आहे. तो सर्व पिकांसाठी झाला पाहिजे. अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया मध्ये जनुकीय बियाणे वापरण्यास परवानगी आहे. त्यामुळे अमेरिकेत सोयाबीन ५० क्विंटल निघते. चीनमध्ये तीच परिस्थिती आहे. अधिक उत्पन्न असल्यामुळे त्यांना कमी दरात धान्य विकणे परवडते, तेच भारतीय शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे जनुकीय अभियांत्रिकी मूल्यमापन समिती यांनी अद्याप बी.टी. वांगे व इतर वाणाला परवानगी दिली नाही. जैविक बियाण्याला परवानगी देण्याची गरज आहे. त्यामुळे उत्पादन वाढून शेतकऱ्यांना मदत होणार आहे.- दादासाहेब येंधे, पुणे




३ मे, २०२०

कोविड योद्ध्यांना लष्कराकडून मानवंदना


कोविड योद्ध्यांना लष्कराकडून मानवंदना
मुंबई, दादासाहेब येंधे : कोरोनाच्या संकटावर लढण्यासाठी, कोरोनाविरोधात लढणाऱ्या पोलीस, पत्रकार, डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी यांच्याप्रति तीनही सैन्यदलांकडून  पुष्पवर्षाव करून मानवंदना देण्यात आली.








जे. जे. रुग्णालयावर पुष्पवृष्टी






सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ






लॉक डाऊनच्या काळात अल्कोहोलिक्स अनॉनिमसद्वारे प्रभावी उपाययोजना

लॉक डाऊनच्या काळात अल्कोहोलिक्स अनॉनिमसद्वारे प्रभावी उपाययोजना
 मुंबई, दादासाहेब येंधे : अनामिक मद्यपी (अल्कोहोलिक्स अनॉनिमस - ए. ए. ) ही बंधुभाव संस्था पूर्वाश्रमीचे मद्यपी आणि त्यांच्या कुटुंबियांना जगभरात स्थापित असलेल्या समुहांद्वारे अल्कोहोलिक्स अनॉनिमस च्या कार्यक्रमाद्वारे आशा आणि मुक्तता प्रदान करते. जगभरामध्ये ए ए च्या मीटिंग सर्वसाधारणपणे अनेक ठिकाणी जसे की शाळा, रुग्णालये, महाविद्यालये आणि संबंधित संस्थांमध्ये आयोजित केल्या जातात. अशाप्रकारे कोट्यवधी मद्यपी मद्यपान करण्यापासून दूर  झाले आहेत.  तथापि, या वेळी कोरोना साथीच्या आजारामुळे, सामाजिक अंतर दूर ठेवण्याच्या सूचनांमुळे सर्व सभा आणि संमेलन स्थाने बंद पडली आहेत.  यामुळे मोठ्या प्रमाणावर व्यत्यय आला आहे. ज्यामुळे एए संदेश प्रसारित करण्याच्या पद्धतींमध्ये तात्काळ बदल करण्यात आला आहे. मद्यापासून दूर राहून सुधारणेचा कार्यक्रम व संदेश देण्यासाठी इतर पर्यायी साधनांद्वारे जसे की ऑनलाईन मीटिंग बाबत ए ए ने जागतिक पातळीवर पाऊल टाकले आहे. भारतात या संस्थेने अनेक राज्यांमध्ये विविध भाषांमध्ये २०० ऑनलाईन सभा सुरू केल्या आहेत.  मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रात २५ ऑनलाईन मीटिंगज आहेत.  दारू थांबविण्याची ज्यांची इच्छा आहे आणि थांबलेली दारू थांबलेलीच रहावी अशा व्यक्ती या ऑनलाईन मीटिंग मध्ये भाग घेऊ शकतात.  या मीटिंग पूर्णपणे विनामूल्य आणि निनावी आहेत. (फक्त ऑडियो ) कोणत्याही व्यक्तीचे व्हिडिओ सदर संस्था प्रसारित करत नाही. आपल्या गुप्ततेची पूर्णपणे काळजी घेतली जाते व  कोणतेही व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जात  नाहीत.
सध्या काही पिणाऱ्या व्यक्तींनी अचानक दारू पिणे थांबवल्यामुळे त्यांना होणारा त्रास व  स्वतःचे बरे वाईट करून घेणे, अशा अनेक घटना घडल्या आहेत आणि अशा रूग्णांना वैद्यकीय चिकित्सक, मानसोपचारतज्ज्ञ आणि रूग्णालयात भरती करणे असे उपाय सुचविणे  आवश्यक आहे.

याकरिता शासनाने हेल्पलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत. अल्कोहोलिक्स अनॉनिमस या बंधुभाव संस्थेनेही महाराष्ट्रभर स्वतःची हेल्पलाइन तयार केली आहे. ज्या व्यक्तींना दारू पिणे थांबविण्याची इच्छा आहे. अशा व्यक्ती व त्या व्यक्तीचे कुटुंबीय, यांना ए.ए. बद्दल अधिक माहिती हवी असल्यास व ए ए  कसे कार्य करते हे जाणून घेण्यासाठी  संस्थेच्या ऑनलाइन सभांना उपस्थित राहू शकतात किंवा ए.ए. च्या सदस्यांशी बोलू शकतात. जगातील कोट्यावधी लोकांसारखे मद्यापासून दूर राहून आनंदी व सुखी जीवन जगण्यासाठी संस्था ऑनलाईन सभांमध्ये आपले स्वागत करीत आहोत.  आम्ही एकेकाळी मद्यपाश या आजाराला बळी पडलो होतो आणि आम्हाला हे माहित आहे की स्वतःचे अनुभव कथन करणे ही पद्धत इतर मद्यपिंना दारूपासून दूर राहण्यास उपयुक्त ठरते. असे संस्थेचे म्हणणे आहे. ज्यांना ऑनलाईन मीटिंग मध्ये सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी  अधिक माहितीसाठी मो. नं.  ९०२२७७१०११, ८०९७०५५१३४ वर संपर्क साधावा. सदर सेवा २४ तास उपलब्ध आहे. वेबसाईट w.w.w. aagsoindia.org.








२७ एप्रिल, २०२०

मुंबईच्या महापौर पुन्हा नर्सच्या गणवेशात

मुंबईच्या महापौर पुन्हा नर्सच्या गणवेशात
मुंबई, दादासाहेब येंधे: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा एकीकडे वाढत असताना दुसरीकडे मात्र मुंबईतल्या आरोग्य सेवेवर मोठा ताण पडत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन मुंबईच्या महापौर कीशोरीताई पेडणेकर यांनी नुकतीच नायर रुग्णालयात जाऊन वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भेट घेतली.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी आधी परिचारिका म्हणून काम केलं आहे. अनेक वर्षे शिवसेनेच्या नगरसेवक राहिलेल्या पेडणेकर सध्या मुंबईच्या महापौर म्हणून कार्यरत आहेत. सध्या कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईतील महापालिकेच्या रुग्णालयांत कोरोनाबधितांवर उपचार सुरू आहेत. इथल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण पडत आहे. याच गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन नायर रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचा हुरूप वाढविण्यासाठी कोशोरीताई परिचारिका घालत असलेला गणवेश परिधान करून नायर रुगण्यात आल्या होत्या. यावेळी त्यांनी येथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्यांनी काही सूचनाही केल्या. 






११ एप्रिल, २०२०

गृहनिर्माण सोसायट्यांकडून कोरोनाला 'नो एन्ट्री'

गृहनिर्माण सोसायट्यांकडून कोरोनाला 'नो एन्ट्री'
मुंबई, दादासाहेब येंधे : कोरोना या विषाणूला थोपविण्यासाठी मुंबई शहर आणि उपनगरांत विविध उपाययोजना युद्धपातळीवर राबविल्या जात असतानाच काळाचौकी येथील श्रीकृपा हौ. सोसायटी, रंगारी बदक चाळ गणेशोत्सव मंडळ, ओमकार रहिवाशी संघ सोसायटी आदींनी कोरोनाला सोसायटीबाहेरच ठेवण्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत.
सोसायटीमधील पदाधिकारी व्हॉट्सअपच्या माध्यमातून राहिवाश्यांसोबत संपर्क साधत पदाधिकारीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी आदेशांचे पालन करीत विविध उपक्रम राबवत कोरोनाविरोधातील लढ्यात आपले योगदान देत आहेत. 


श्रीकृपा हौ. सोसायटीचे अध्यक्ष श्री. लक्ष्मण देवरुखकर, सेक्रेटरी श्री. संतोष सकपाळ, गणेश काळे, महेश पांगे यांनी सांगितले की, आम्ही स्वतःच क्वारंटाईन होऊन आम्ही आमच्या सोसायटीत कोरोनाचा शिरकाव होऊ देणार नाही. आमच्या सोसायटीने तातडीने उपाययोजना म्हणून सोसायटीचे मुख्य गेट बंद केले आहे. तसेच सोसायटीच्या मुख्य गेटमधून आत येताना गेटवर जीवन प्रबोधिनी ट्रस्ट तर्फे हात धुण्यासाठी पाणी व सॅनिटायझर उपलब्ध करून दिले आहे.





 ओमकार रहिवाशी संघ या सोसायटीचे पदाधिकारी श्री. नरेंद्र पांगे, घाडीगांवकर यांनीही खबरदारी म्हणून सोसायटीचे मुख्य गेट बंद केल्याचे सांगितले.


 तसेच गेटवर नागरिकांनी स्वतःची कोरोनापासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी याचा बोर्डदेखील लावल्याचे सांगितले. तर रंगारी बदक चाळ सार्वजनिक गणेशोत्सतव मंडळातर्फे मुख्य गेटच्या समोर उड्डाणपुलाच्या पिलरवर कोरोना या विषाणूपासून घाबरून न जाता स्वतःची काय काळजी घ्यावी याची सविस्तर माहिती तसेच राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष नंबर, टोल फ्री नं., राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांकाचा बोर्ड लावण्यात आला आहे.







१० एप्रिल, २०२०

सोशल डिस्टिंगशिंगचे तीनतेरा

सोशल डिस्टिंगशिंगचे तीनतेरा
मुंबई, दादासाहेब येंधे : भायखळा येथील भाजी  मार्केट अगदी कमी जागेमध्ये वसलेले आहे. महापालिका प्रशासनाने व मुंबई पोलिसांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथे गर्दी होऊ नये म्हणून राणीबागेत सदर मार्केट स्थलांतरित केले. मात्र, तिथेही गर्दी करीत नागरिकांनी सोशल डिस्टिंगशिंगचे नियम पायदळी तुडवले. अगदी जवळ जवळ उभे राहून नागरिकांच्या भाजीपाल्याचे भाव विचार त्यांना दिसून येत होते. पोलीस वारंवार नागरिकांच्या सूचना देतानाचे चित्र समोर येत आहे.







५ एप्रिल, २०२०

देशात दिवे लावून ऐक्याचं दर्शन

देशात दिवे लावून ऐक्याचं दर्शन
हा उत्सव नव्हे एकतेचा संदेश
मुंबई, दादासाहेब येंधे : माननीय पंतप्रधान नरेंद मोदी यांनी केलेल्या आवाहनाला ९ वाजून ९ मिनिटांपर्यंत प्रत्येक भारतीयाने आपल्या घरातील लाईट बंद करत सोशल डिस्टंकशिंग पाळत आपापल्या घरात, गॅलरीत मोबाईल टॉर्च, दिवे, मेणबत्ती पेटवून ऐक्याचं दर्शन घडविलं.

यावेळी 'भारत माता की जय, 'गो कोरोना गो' आणि एकतेच्या घोषणा ऐकायला मिळाल्या. यावेळी सारा आसमंत दुमदुमून गेला होता.

कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. आता तो आपल्या देशातही वेगाने हातपाय पसरू लागला आहे. त्याचा सामना करण्यासाठी सरकारने संपूर्ण देशातच लॉकडॉऊन केले आहे. या काळात जनतेने आपल्या घरातच राहावे आणि सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन करावे, असेही सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. एवढेच नाही, तर या कोरोनाचा पराभव करण्यासाठी जनतेने काय करावे आणि काय करून नये यासंदर्भातही वारंवार सरकारकडून सूचना केल्या जात आहे. जनतेकडूनही मोठ्या प्रमाणावर याचे पालन केले जात आहे. आज पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला संपूर्ण देशातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद देत कोरोनाविरुद्धच्या या लढाईत आम्ही सर्व एक आहोत याचे दर्शन घडवले आहे.

काळाचौकी, मुंबई येथील श्रीकृपा हौ. सोसायटीत मेणबत्त्या प्रज्वलित
करून करोना चा निषेध केला.




कासार वडवली पोलीस ठाणे, ठाणे








४ एप्रिल, २०२०

सोशल मिडियामधून तेढ पसरवणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा इशारा

सोशल मिडियामधून तेढ पसरवणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा इशारा
मुंबई, दादासाहेब येंधे :  कृपा करून शिस्त पाळा, सहकार्य करा असे मी जेंव्हा हात जोडून म्हणतो ते माझ्या महाराष्ट्रातील तमाम बंधु, माता- भगिनींसाठी असते जे अतिशय संयमाने, जिद्दीने आणि आत्मविश्वासाने या कोरोना विषाणुविरुद्ध लढत आहेत. पण समाजात आणखी एक समाजविघातक विषाणू पसरत आहे, सध्याच्या परिस्थितीचा दूरूपयोग करून जर कुणी माझ्या बंधू, माता-भगिनी आणि महाराष्ट्राला अडचणीत आणत असेल तर अशा समाजविघातक वृत्तींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असा सज्जड इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. आज मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमांवरील थेट प्रसारणाच्या माध्यमातून जनतेला संबोधित केले. प्रारंभी त्यांनी सोलापूरच्या ७ वर्षाच्या आराध्या नावाच्या मुलीने वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत केल्याचा  आवर्जून उल्लेख केला व तिला शुभेच्छा दिल्या.
एकजुटीला गालबोट लावू देणार नाही कोणत्याही धर्माच्या, पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमांना मान्यता नाहीच. राज्यात पाडवा, रामनवमी, पंढरपुरची यात्रा यासारखे सर्व मोठे सण अगदी घरगुती स्वरूपात आयोजित झाले, कोणतेही मोठे उत्सव वा कार्यक्रम झाले नाहीत. ज्याप्रमाणे हे कार्यक्रम झाले त्याचप्रमाणे इतर धर्मियांनी सुद्धा आपले सण, समारंभ आणि कार्यक्रम करावेत, एकत्र येणे, गर्दी करणे टाळावे कारण राज्यात कोणत्याही धर्माच्या, राजकीय पक्षाच्या आणि कोणत्याही कारणासाठी कोणत्याही कार्यक्रमांना, खेळाच्या स्पर्धांना परवानगी दिली जाणार नाही म्हणजे नाहीच, तशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे असे कार्यक्रम आयोजित केलेच जाऊ नयेत असे कडक शब्दात स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, या विषाणुशी सगळे एकजुटीने लढत आहेत. याला कुणी गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये, ते सहन केले जाणार नाही. इलाज म्हणून नाईलाजाने घरी बसा. हा विषाणु कोणताही जातधर्म पहात नाही. याची बाधा सगळ्यांना सारखीच होते. त्यामुळे इलाज म्हणून नाईलाजाने का होईना घरी बसा, गर्दी टाळा, संयम, जिद्द आणि आत्मविश्वासारखे दुसरे आयुध नाही, या आयुधाच्या मदतीने आपण हे युद्ध नक्की जिंकू असे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी आज समाजविघातक कृत्ये करणाऱ्या प्रवृत्तींना आपल्या बोलण्यातून स्पष्ट इशारा आणि कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. (महासंवाद)




महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुबई विभागातर्फे मोफत जेवण वाटप

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुबई विभागातर्फे मोफत जेवण वाटप
मुंबई, दादासाहेब येंधे : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मुंबई विभागीय अध्यक्ष मा. संदीप माळवदे, पत्रकार उमेश कुडतरकर आणि सहकारी यांनी मुंबईतील मालाड येथील झोपडपट्टीतील गरीबांना मोफत जेवण वाटप केेेले.
 करोना या विषाणूच्या पार्श्वभूमीवर देश लॉक असताना मुंबई शहरात रस्त्यावरील छोट्या-मोठ्या खाऊगल्ल्या, हातगाड्या, हॉटेल बंद झाल्यामुळे रस्त्यावरील भिकाऱ्यांचे, गरिबांचे, गरजवंतांचे खाण्यापिण्याचे हाल सुरू झाले आहेत. लॉकडाऊनमुळे  त्यांच्या उपजीविकेची सर्व संसाधने बंद झाली आहेत.  अशा गरिबांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुबई विभागातर्फे मोफत जेवण पाकिटांचे वाटप करण्यात आले.








२ एप्रिल, २०२०

धक्कादायक ! लोहमार्ग पोलिसाला कोरोनाची लागण


पोलीसांनी गाण्यातून दिला घरातच बसण्याचा संदेश

पोलीसांनी गाण्यातून दिला घरात बसण्याचा महत्त्वाचा संदेश
मुंबई, दादासाहेब येंधे: कोरोना या विषाणूवर मात करण्यासाठी सरकार तसेच प्रशासनाने कंबर कसली आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून सरकार आणि प्रशासनाला साथ द्यावी, असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. संचारबंदी, लॉक डाऊनच्या काळात कुणीही घराबाहेर पडू नये अशा सूचनाही पोलिसांमार्फत वायरलेस गाडीवरून गल्लो-गल्ली फिरून देण्यात येत आहे.
माननीय मुुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री हेही राज्यातील जनतेला वेळोवेळी मार्गदर्शन करीत आहेत. विविध वृत्तपत्रांतून, न्यूज चॅनेलमधून, बातम्यांतून पत्रकारही जनजागृती करत आहेत.
यातच राज्याच्या पोलीस दलातील काही पोलीस बांधवांनी वेगळी शक्कल लढवली आहे. गाण्याच्या माध्यमातून नागरिकांमध्ये कोरोना विषाणूसंदर्भात जनजागृती करून घराबाहेर न पडण्याचे अनोखे आवाहन करताना दिसून  येत आहे. 
'घरात बसा, रोडवर फिरता कशाला...
कोरोना होईल रोगानं या मरता कशाला...








२८ मार्च, २०२०

पोलीसांतील माणुसकीचे दर्शन

संचारबंदीत पोलीसांतील माणुसकीचे दर्शन
दादासाहेब येंधे, मुंबई: करोना या विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या टवाळखोरांना पोलीस फटक्यांचा प्रसाद देताना सर्वांनी पाहिले. विविध सोशल मीडियावर ते व्हिडिओ शेअरही केले. पण, याच कठोर वाटणाऱ्या पोलिसांची माणुसकी कुणालाही दिसत नाही. 
शहरात रस्त्यावरील छोट्या-मोठ्या खाऊगल्ल्या, हातगाड्या, हॉटेल बंद झाल्यामुळे रस्त्यावरील भिकाऱ्यांचे, गरिबांचे हाल सुरू झाले आहेत. लॉकडाऊनमुळे  त्यांच्या उपजीविकेची सर्व संसाधने बंद झाली आहेत. अशा गरिबांना मास्क वाटप करून त्यांना जेवण देऊन पोलीस दल आपली माणुसकी जपत असल्याचे चित्र जणू दिसून येत आहे.





रस्त्यावरील गरीब व्यक्तीला जेवण देताना, जोगेश्वरी, मुंबई

रस्त्यावरील गरिबांना मास्क देताना

मास्क वाटप



























२७ मार्च, २०२०

संचारबंदी मोडणाऱ्यांना लाठीचा प्रसाद

मुंबई, दादासाहेब येंधे : करोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध प्रयत्न करीत असताना नागरिकांना अजूनही करोनाचा धोका समजलेला दिसत नाही. संचारबंदी आणि लॉक डाऊन जाहीर केल्यानंतरही शहरांत नागरिक जीवनाश्यक वस्तू खरेदी करण्याच्या नावाखाली बिनधास्तपणे संचार करत आहेत. औषधे खरेदी करण्याच्या नावाखाली फेरफटका मारत गर्दी करताना दिसून येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखविण्यास सुरूवात केली आहे. 
करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लॉक डाऊन, संचारबंदी जाहीर केली असली तरी नागरिक नियमांचे पालन करीत नसल्याचे निदर्शनास येत आहे. परिणामी, नागरिकांना पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागत आहे. तर काही ठिकाणी पोलिसांवरच हात उगारल्याच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. पोलीस हा सुद्धा माणूस आहे. त्यांना कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मदत करणे गरजेचे आहे.

पोलिसांवर हल्ला झाल्याचा व्हिडिओ


गावाकडे जाऊन विहिरीत एकत्र पोहण्याचा मनमुराद आनंद घेताना

संचारबंदी असतानाही बाईकस्वार फिरताना











सोशल मिडियांवर व्हायरल झालेले काही व्हिडिओ.











२२ मार्च, २०२०

अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांबद्दल कृतज्ञता

जनता कर्फ्युला देशवासीयांकडून प्रतिसाद
दादासाहेब येंधे, मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार रविवारी संध्याकाळी ५.०० ते ५ वाजून ५ मिनिटांपर्यंत आपल्या घरातून, खिडक्यांत उभे राहून, गॅलरीतून  भांडी, घंटा, शंख आणि टाळ्या वाजवून करोना विषाणू विरोधात लढत असलेल्या लोकांचा सन्मान केला.
आम्ही या विषाणूशी लढण्यास वचनबद्ध आहोत असा संदेश जणू मुंबईकरांनी आपल्या कृतीतून व्यक्त केला आहे.











जनता कर्फ्युला मुंबईकरांकडून प्रचंड प्रतिसाद


जनता कर्फ्युला मुंबईकरांकडून प्रचंड प्रतिसाद
दादासाहेब येंधे, मुंबई: कोरोनाच्या भीतीमुळे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला स्वतःसाठी घराबाहेर पडू नका, जनतेने जनतेसाठी "जनता कर्फ्यु" पाळावा या केलेल्या आवाहनाला मुंबईत उत्स्फूर्त प्रतिसाद मुंबईकर देताना दिसत आहेत.
करोना या विषाणूचा वाढता प्रसार रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशात 'जनता कर्फ्यु'चं आवाहन केलं होतं त्याला मुंबईकर प्रचंड प्रतिसाद देत आहेत. मुंबईतच नव्हे तर ठाणे, पुणे, नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुंबईत रस्त्यांवर लोकल आणि बसमध्ये प्रवाशी नसल्याने शुकशुकाट निर्माण झाला आहे. नागरिकांनी घरातच बसणे पसंत केल्याने घड्याळाच्या काट्यावर दिवसरात्र धावणारी मुंबई आज शांत झाली आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.